मुंबई : राज्यासह मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात मुंबईची 'तुंबई' झाली आहे. पहिल्याच दिवशी मुसळधार पावसामुळं अनेक भागात पाणी साचले. यामुळं नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार महेश सावंत यांनी भाजपा आणि महापालिकेच्या महापौर रितू तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे."ईटीव्ही भारत"शी बोलताना महेश सावंत म्हणाले की, "यंदाही मुंबई तुंबणार हे आम्हाला माहिती होतं. नालेसफाई फक्त कागदावरती होती. प्रत्यक्षात ती झालेली नव्हती. महापौरांकडे कोणतेही अधिकार नाहीत, असं वाटतं. कारण त्यांच्या आजूबाजूला जे नेते बसले आहेत, तेच निर्णय घेत आहेत. आवडता कॉन्ट्रॅक्टर बघून त्याला कामं दिली जात आहेत. यामुळं महानगरपालिकेचे आणि भाजपाचे ढिसाळ प्रशासन पुन्हा एकदा समोर आलं आहे. तसंच महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना गेल्या चार वर्षांपासून कसंही कामं करण्याची सवय झाली आहे. त्यांच्यावर कोणाचाही अंकुश राहिलेला नाही. अधिकारी काम करत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. यामुळंच आजही मुंबईमध्ये पाणी तुंबत आहे."याचबरोबर, ऑपरेशन टायगरद्वारे सहा खासदार फुटल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आणि नगरसेवक देखील फुटू शकतात, अशी चर्चा आहे. यावर बोलताना महेश सावंत म्हणाले की, "सत्तेचा माज आल्यावर काहीही होऊ शकतं. मात्र सगळेच लोक विकाऊ नसतात. स्वाभिमानी लोक हे शिवसेनेत आहेत. यामुळं आमदार, नगरसेवक फुटणार नाहीत."
Comments